सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षा रुंदावतात - गंगाधर ढवळे

शालेयवृत्त सेवा
0

 


जवळा (दे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न


नादेड / लोहा ( शालेय वृत्तसेवा ) :

     शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत 'सहल' या उपक्रमामुळे प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देता येतात. तसेच सहलीमुळे बालकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, असे मत लोहा तालुक्यातील जवळा (दे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले. यासाठी बंदिस्त भिंतीच्या आतील अभ्यासक्रम एक दिवस टाळून सहलीचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच जवळा (दे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र माहुरगड  येथे आयोजित करण्यात आली होती.  


             सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ढवळे बोलत होते. ते म्हणाले की, साडेतीन पिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरचे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रकुट काळात निर्मिती झालेली प्राचीन पांडव लेणी हा इथला ऐतिहासिक ठेवा आहे. सहली दरम्यान श्रीरेणुका देवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर आदी धार्मिकस्थळेही येथे आहेत. त्याचबरोबर रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा इथे भेटी देण्यात आल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन गच्चे, सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे, विश्वजीत पवार आदींची उपस्थिती होती. 


              सहलीच्या निमित्ताने एखाद्या विशिष्ट ठिकाणची भौगोलिक तथा ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी लोहा तालुक्यातील जवळा येथील जि. प. शाळेच्या मुलांनी श्रीक्षेत्र माहुरगड या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळवली. प्रत्येक ठिकाणचे वेगळे महत्त्व असते. यामुळे निरीक्षणे तथा माहितीचे संकलन आणि सारणीकरण हे कौशल्य आत्मसात करता आले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यास आणि त्यांना बाहेरील जगामध्ये खऱ्या आनंदाची ओळख करून देण्यास मदत झाली. यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


       यानिमित्ताने सद्गुरू साईनाथ महाराज बरबडेकर यांच्या आनंदाश्रमात सुग्रास सहभोजनाचा आनंदही मुलांनी घेतला. तसेच शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन केले पाहिजे याचे खरेखुरे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले. आंबाळा मानेवाडी फाटा येथील हनुमान मंदिर आणि एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सहलीच्या स्थळांचे पावित्र्य टिकविणे, कुठलीही नासधूस करु नये, आपल्यासोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकणे आदी सूचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)