"जमाव जेव्हा स्वार्थासाठी गोळा होतो नीती मूल्यांचा मग पालापाचोळा होतो, राब राबती मायबाप ज्या पोरांसाठी त्याच मुलांचा तिकडे कान्हा डोळा होतो "

शालेयवृत्त सेवा
0


रिमझीम पावसात मना मनातील गझल मैफल रंगली !


छत्रपती संभाजी नगर ( शालेय वृत्तसेवा ) :

         अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (नोंदणीकृत) महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय 'कविता शेती मातीच्या ' शिर्षक असलेले आभासी कवीसंमेलन नुकतंच संपन्न झाले. गझल संमेलनाचे अध्यक्ष सन्मित्र चंद्रकात कदम हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे यांनी केले तर मराठवाडा विभाग अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविक केले. एका पेक्षा एक गझलांच्या सादरीकरनाने मैफल रंगली.

           जयराम धोंगडे या गझलकारानी सुंदर गझल सादर करून वाहवा मिळवली..

"जमाव जेव्हा स्वार्थासाठी गोळा होतो 

नीती मूल्यांचा मग पालापाचोळा होतो, 

राब राबती मायबाप ज्या पोरांसाठी 

त्याच मुलांचा तिकडे कान्हा डोळा होतो "

       प्रा. विजय पाटील यांनी लयबद्ध गझल सादर केली..

"सांगू कसे कुणाला जगणे कठीण झाले 

विरहात एकटेही मरणे कठीण झाले, 

प्रेमातला भरोसा राही कसा कुणावर 

विश्वास शब्दा आता स्मरणे कठीण झाले " 

        सन्मित्र चंद्रकांत कदम यांनी मनाला ठाव घेणारी गझल सादर करून दाद मिळविली.. 

" म्हना आपला वा झूगार मला 

सहन होईना कोंडमारा मला

किती प्राक्तना ही विषमता तुझी 

तिला चांदणे आणि निखारा मला "

         गझलकार रुपेश मुनेश्वर यांनी तरन्नुम मधे गझल सादर करून वाहवा मिळवली..

" या मनाच्या यातनांना जाण प्रिये 

दुःख माझे मांडले मी प्राण प्रिये,

या चितेला शांत करण्या मागतो मी 

दे जराशी आसवांचे दान प्रिये "                

        भूमय्या इंदूरवार यांनी 

' बाकी काही नाही ' ही गझल सादर केली..

"आयुष्य म्हणजे जगणे बाकी काही नाही 

जसं जमेल तसे वागणे बाकी काही नाही 

ती भेटल्यावर हसते मन मुराद जरी 

तिचे ते हसून लाजणे बाकी काही नाही "

       विजय वाठोरे यांनी गझल सादर केली..  "कायम फुलावरी जीव ओवाळतात काटे 

स्वार्थी फुले तरीही का टाळतात काटे 

वाट्यास रोज त्यांच्या अवेलना जगाची 

हृदयात वेदनांना सांभाळतात काटे " 

        बापू धनवे यांनीही सुंदर गझल सादर केली..

"मलाही कल्पना आहे तुझा . होणार नाही मी 

तरी व्हीवीस माझी हट्ट हा धरणार नाही मी "

         स्वाती कौलवार या गझलकाराने अप्रतिम गझल सादर केली..

"लक्षात निघताना जरी असले तरी विसरू जा

भेटायला काहीतरी माझ्या घरी विसरून जा

सांधायचे आहे पुन्हा नाते आता ठरलेच जर 

होते कधी दोघांमध्ये कुठली दरी विसरून जा "

      गझलकारा रोहिणी पांडे यांनीही अप्रतिम रचना सादर करून वाहवा मिळवली.. 

"किती बोलतो मोठमोठे व्यासपीठावर 

सांगत नाही कधीच तोटे व्यासपीठावर 

विद्वानांची टोळी असते पडद्यामागे 

नर्मदेतले नुसते गोटे व्यासपीठावर " 

         रघू देशपांडे याने सुंदर गझल सादर केली.

"शृंगार रस जरासा बाजूला ठेवला मी 

अध्याय वेदनेचा समजून घेतला मी 

सगळेच प्रश्न होते अनिवार्य जीवनाचे 

पेपर तसाच कोरा देवून देऊन टाकला मी "

         निशा डांगे या गझलकाराने सुंदर रचना सादर केली..

"गरजेपुरते फक्त वायदे करतो 

कामानंतर तोंड वाकडे करतो 

बघण्यासाठी रूप निराळी आपले 

वेगवेगळे उभे आरसे करतो"

          रश्मी कौलवार या गझलकाराने खुपच सुंदर रचना सादर करून वाहवा मिळवली..

"भरली नाही जखम जुनी ही नवा वेगळा घाव कशाला

जिथे आटला सागर आहे तिथे नदीचे धाव कशाला "

           गझलकारा अंजली कानिंदे- मुनेश्वर यांनी सुंदर गझल सादर केली..

" नको तेंव्हा तुला कळणार आहे का अनंता मी 

हवी होते तुला कळणार आहे का अनंता मी,

बरी बूरी तुझी होते नव्या काळी तुझ्यासाठी 

पुन्हा जूनी तुला कळणार आहे का अनंता मी "

         वैशाली कयापाक, प्रिया कौलवार, विजय ढोबे, यांच्यासह राज्यातील अनेक गझलकारांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय आभासी कविसंमेलनात महाराष्टातील अनेक शिक्षक कवींनी सहभागी होवून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमचे बहारदार सुत्रसंचालन गझलकार रुपेश मुनेश्वर यांनी केले तर आभार शेषराव पाटील यांनी मानले. नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमास हर्षल साबळे, शालिनी मेखा, श्रीकांत पाटील, तानाजी आसबे, बाबाराव डोईजड, प्रकाश पारखे, नरेंद्र कन्नाके, मोहिनी बागुल, सचिन कुसनाळे, बिभिषण पाटील यांच्यासह अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्य व मराठवाडा विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)