डॉ बाबासाहेब आंबेडकर उपेक्षित, वंचितांचे कैवारी...
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उपेक्षित, वंचितांचे एकमेव कैवारी होते .त्यांनी वंचित , उपेक्षितांना शिक्षणाच्या माध्यमातून आत्मसन्मानाची शिदोरी बांधून दिली आणि युगायुगापासून अवमानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या कोट्यावधी बहुजनांचा उध्दार केला असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांनी प्रतिपादन केले आहे. ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मिशनचे संचालक डॉ दीपक कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, डॉ यशवंत चव्हाण, डॉ रवी सरोदे , व्यंकटराव भोसीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिशनमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या युवकांना आजन्म अध्ययन करत राहण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ दीपक कदम यांनी डॉ बाबासाहेबांच्या प्रेरक विचारातून स्पर्धा परीक्षेची तयारी करून समाजासाठी त्याग करण्याचे आवाहन केले. शिक्षणक्रांती हाच राष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव आधार असल्याचे डॉ कदम यांनी प्रतिपादन केले.. डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शिक्षण क्रांतीसाठी युवक, बुद्धिजीवी आणि समाजातील बहुजनांनी समर्पित भावनेने साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि आभार डॉ दीपक कदम यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .