शिक्षक : भावी पिढीचा शिल्पकार.... शेख युसूफ

शालेयवृत्त सेवा
0

 


🔴 शिक्षक : भावी पिढीचा शिल्पकार.... 

( शिक्षक दिन विशेष )


" सब धरती कागज करु

लेखणी सब बन राय

सात समुंदर की गस्ती करु 

गुरु गुण लिखा न जाय,,,,!



भारतीय संस्कृतीत गुरुला सर्वोच्च स्थानी बसवून त्याच्या तेजस्वीतेची पूजा करणारी आपली थोर परंपरा आहे.गुरुमुळे माणसाला माणूसपण येते.व्यक्तीचा सर्वांगीणविकास,राष्ट्रांची चौफेर प्रगती ,समाजाचा सर्वागीण विकास,सुप्त गुणांचा विकास आणि भविष्याला आकार देणारी संस्कार संपन्न नी कर्तव्य निष्ठ पिढी तयार करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही,,, भारतीय संस्कृती ही बुद्धी प्रधान संस्कृती आहे.



निसर्ग ज्या प्रमाणे गाजावाजा न करता काम करित असतो व फळे , फुले फुलवित असतो त्याच प्रमाणे गुरुजन देखील निमुटपणे आपले कार्य करित इतरे जनांमध्ये केवळ आनंद निर्माण करित असतात.गुरुच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे व त्यांचे ऋण फेडणे त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रतेकाची श्रेयस वप्रेयस भूमिका असाते.व यातुनच समाज व राष्ट्र उदयास येत असते व याला कारणमाञ असतात ते श्रेष्ठ गुरुजन ,देश आणि समाज ,वर्तमान आणि भविष्य ,वास्तव आणि स्वप्न यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य ते फक्त आणि फक्त शिक्षकामुळे.देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण च आवश्यक का? याचाही विचार करावा लागेल.आणि त्यासाठी अध्यापणाला धर्म मानणाऱ्या शिक्षकांचीही अटळता आपल्याला लक्षात येऊ शकेल.



शास्ञाने प्रदेश जिंकता येते,पण मन जिंकता येत नाही .सत्तेने प्रशासन जिंकता येते पण माणूस उभा करता येत नाही.पैश्याने माणूस विकत घेता येतो पण माणूस माणसासी जोडता येत नाही पण या सर्व गोष्टी शि-शिक्षणाने साध्य होतात.शिक्षक त्याला मुर्त रुप देऊ शकतात..स्वामी विवेकानंदजी म्हणतात .व्यक्तीमत्वाची जडणघडण , चारिञ्याची बांधणी,कौशल्याचा विकास,मातृभूमीवरील प्रेम आणि मनांची श्रीमंती -समृध्दी ज्या मुळे घडते ते खरे शिक्षण होय असे म्हटले आहे.जपान,स्वीडन या सारखी राष्ट्रे सर्वाधिक खर्च शिक्षणावर करतात.14 ,15,16 वर्षाची मुले जपान मध्ये आपले शिक्षण स्वतःच्या पैशातून पूर्ण करतात..आपला भारत देश 15 आगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला .त्याच वेळी क्युबा हा देश पण स्वतंत्र झाला आणि 1948 लाच क्युबाने RTE- चा कायदा लागू केला . 



आता हा विस्कटलेला वर्तमान आणि झाकाळून गेलेलं भविष्य यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा याचा विचार करणे अनाठाई होणार नाही,शिक्षणाचे सामर्थ्य त्याचे स्पशित्व आणि त्याची माणुस घडविण्याची क्षमता ओळखणारा शिक्षक आसेल तरच शिक्षणाचीही सफलता आपणाला जाणवेल.अध्यापण हा पोटार्थी धंदा नसून तो धर्म आहे.अध्यापन ही समर्पित भावनेने करावयाची उपासना आहे. परंतू  बुरख्याआड लपून शिक्षकी पेशाला बदनाम करण्यासाठी काहींनी बोगस च्या कुबड्या चा वापर करून सर्व शिक्षण यंञणेला बदनाम केले..असे शिक्षक विद्यार्थ्यांना काय आदर्श पाठ शिकवणार. यांच्या कडून कोणती मूल्ये शिकण्यासारखी आहेत. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या च्या मानेवर पाय देणारे गुरुजी समाजासाठी काय आदर्श ठरतील..म्हणून तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.



शिक्षकाचा वापर नेते मंडळी करून घेत आहे, शिक्षणात राजकारण जास्त आणि राजकारणात शिक्षण कमी असे चिञ पाहावयास मिळते.. विद्यार्थ्यांच्या चित्तापेक्षा वित्ताकडेच जास्त लक्ष केंद्रित होताना दिसतो.. त्यामुळे शिक्षणात 'जिसकी लाठी उसकी भैंस' म्हणण्याची वेळ येते. आणि 'लबाड बांधती ईमले म्हाड्या आणि गुणवंताना झोपड्या'असे म्हणण्याची वेळ येते .समाजात अतिशय गुणवंत शिक्षक आहेत .त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक आहे.पण बिचाऱ्या शिक्षकांनी फक्त अध्ययन -अध्यापनाचेच काम करावे.. आणि बाकीच्यांनी नेतेगिरी करत फिरावे .चारित्र्य वान शिक्षक हे शाळेचे वैभव असते.



आज आपल्यांपैकी काहीजणांमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने वाढत आहे.विद्यार्थ्यांसमोर गुटखा,पुडी तथा धूम्रपान सर्रास चालू आहे तथा विद्यार्थ्यांना काही अपवादात्मक शिक्षक तोटा,पुडी दुकानातून आणायला लावतात.या बाबी टाळता येतात. आज काल काही वेळेस पेपरमधून 'शिक्षकाकडून छेडछाड 'अशा आशयाची वृत्ते वाचावयास मिळतात . मग अशा गुरुजनांकडून समाजाने काय आदर्श घ्यावा? आपल्या देशाला Dr.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले,सावित्री बाई फुले, डा.सर्वपल्ली राधाकृष्णन ,सानेगुरुजी यासारख्या थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे.



शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाला मोलाचे स्थान आहे, परंतु काहींच्या वाईट वागणूकी मुळे शिक्षकांची धार समाजात कमी होत चालली आहे.आज शिक्षणक्षेञात मोठा मासा छोट्या माशाला खात आहे . आपली जी व्यावसायिक जबाबदारी आहे त्याकडे दुर्लक्ष करुन अल्पजन साईड बिझनेसच्या मागे धावत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले. सावित्री बाई फुले, फातिमा शेख, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, साने गुरुजींनी या महान विभूतींनी आपल्याला दिलेली शिदोरी जर आम्ही सर्वांना वाटली ,त्याचे विचार ,आचार अंगी बाणवले तर कोणतीही समस्या उदभवणार नाही.


"जरी असशील तू आजचा विद्यार्थी !

तुझ्याच हाती असे उज्ज्वल भविष्य निर्मिती 

ध्येय असावे उरी तुझ्या ,राष्ट्राच्या अखंडतेचे

ऋण फेडावेस तू,या मातृभूमीचे.!



आपण सामाजिक अभियंते आहोत .समाजाचे आपण काही देणे लागते ,म्हणून तन-मन तथा जीव लावून किमान 50%तरी काम ईमानईतबारे काम करावे नव्हे आपण करतोच कारण..आजकाल शिक्षण  विभागाला शिक्षणावर जालीम उपायच सापडला नाही.,,हे एक उपक्रम आला की लगेचच दुसरा उपक्रम.,पहिल्या उपक्रमाची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे न पाहताच लगेच दुसरा उपक्रम तयार..धाड धाड कार्यक्रम ..फक्त कागदी काम.. अशैक्षणिक कामाचा बोजा खूप पडला आहे.तरीही सेवाभाव म्हणून काम करावे...सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे.कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर संकटाने शैक्षणिक ,सामाजिक ,आर्थिक चक्र बिघडले आहे...तरीही शासनाने दिलेल्या शैक्षणिक सूचनांचे पालन करून   सेतू अभ्यासक्रम,,शाळापूर्व तयारी..कृतिपुस्तिका इ.उपक्रम घेत आहोत..   सध्यातरी नियोजित अभ्यासक्रमाला हात लावला नाही. .


"नव्या दिशेचे ,

नव्या युगाचे ,

गीत सूर हे गाती..

या मंगल देशाचे भविष्य, 

आहे आपुल्या हाती.. !


शिक्षक कसे असावेत :


शिक्षकाचे प्रमुख कार्य शील संवर्धन आहे.याचा सर्व शिक्षकांनी अंगिकार करावा.शिक्षकांमध्ये नवचैतन्य असावे.नवनिर्माणक्षमता असावी.विद्यार्थ्यांचे हित सतत जपणारे व आपल्या विषयाची ज्ञानसाधना सतत करणारे उत्साही शिक्षक असावेत. निष्कामभावाने सेवा करणारे असावेत. शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा.विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा.चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा संवादातून ,आचरणातून चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला असलेला शिक्षक कर्तबगार विद्यार्थी घडवू शकेल.आपल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असलेला व शिकवत असलेल्या पाठाचे परिपूर्ण अभ्यास करूनच वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वा माहिती देणारा असावा.



आज जरी शिक्षणक्षेञाकडे वा शिक्षकाकडे पाहण्याचा शासनाचा वा समाजाचा दृष्टिकोन फारसा चांगला नसला तरी,व्रतस्थ दृष्टिकोन व सामाजिक ऋणांची फरतफेड म्हणून का होईना आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून ज्ञानदान करावे म्हणजे आपण निवडलेला व्यवसाय वा सेवा ख-या अर्थाने सार्थक झाल्याचा आनंद होईल.. आज दररोजच्या अहवालाने मानसिक स्वाथ्यावर परिणाम होताना दिसतो.,शिक्षक  हा मानसिकदृष्ट्या समाधानी असला तरच तो विद्यार्थ्यांना चांगले व परिपूर्ण  ज्ञान देऊ शकतो,,तरीही आपण आपला वसा सोडायचा नाही.,कारण आपले काम आधुनिक पिढीला सुधारण्याचे आहे..त्यांना चांगले नागरिक बनविण्याचे आहे..भले आसली कितीही कामे आली तरी चालेल.



"है भाग्य अपना ,अंधेरा मिला है..

शमा बनके जलने का, मौका मिला है.

भले कितना ही हो अंधेरा,

हमें टिमटिमाने का मौका मिला है !




 - शेख युसूफ मौलासाब

     ( सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथ.शाळा नवरंगपुरा )

||•••शिक्षकदिनाच्या सर्वांना अगणित शुभेच्छा!.•••||

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)