आंतरजिल्हा बदलीबाबतच्या तक्रारीचे एक महिन्याच्या आत निपटारा करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश | Inter District Transfer

शालेयवृत्त सेवा
0

 





शिक्षक राज्यरोस्टर कृती समितीच्या पाठपुराव्यास यश 


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मार्फत विन्सीस आय टी सोल्युशन या पुण्याच्या एका कंपनीच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने  आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने बदल्यांच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याची बाब शिक्षक राज्य रोस्टर कृती समितीने एका निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,ग्रामविकासमंत्री व ग्रामविकास सचिवांच्या निदर्शनास आणून दिली होती.


तसेच विभागीय आयुक्तांकडे या बदल्यांमध्ये  अन्याय झालेल्या हजारो शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्याची बाबदेखील निदर्शनास आणून दिली होती. शिवाय  या तक्रारींचे निपटारा  करून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेत आज ग्रामविकास विभागाने एक पत्र काढत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या शिक्षकांना विभागीय आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यास सांगितले व एक  महिन्याच्या आत या तक्रारींचे निपटारा करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले. 


शिवाय ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविलेल्या पुण्याच्या विन्सीस आयटी सोल्युशन कंपनीला अन्यायग्रस्त शिक्षकांची वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे बदली प्रक्रियेतील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे.या निर्णयाबद्दल राज्यभरातील शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



जिल्हा परिषद शिक्षकांच्या बहुप्रतिक्षित अशा बदल्यांच्या प्रक्रियेत खूप मोठी अनियमितता घडल्याच्या अनेक तक्रारी आहेत.अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागा उपलब्ध असताना रिक्त जागा शून्य असल्याचे दाखविले. अनेक ठिकाणी मूळ परिपत्रकाला बाजूला ठेवत सेवाज्येष्ठता डावलून सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. सेवाज्येष्ठतेऐवजी पसंतीक्रम ग्राह्य धरून बदल्या झाल्या .अनेकांचे बदली संवर्ग बदलले गेले.याचा 18 ते 20 वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यात सेवा करणाऱ्या हजारो शिक्षकांना बसला होता.या संदर्भात शिक्षक राज्यरोस्टर कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्याकडे दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली. विभागीय आयुक्तांकडे या तक्रारींच्या प्रकरणांची दखल घेतली जाणार असल्याने समाधान आहे.सुनावणी घेऊन या अन्यायग्रस्त शिक्षकांना ऑफलाईन पदस्थापना द्यावी.


--ॲड. राजकुमार रंगनाथ पाटील

मुख्य निमंत्रक

शिक्षक राज्यरोस्टर कृती समिती महाराष्ट्र राज्य



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)